मोर्शी (अमरावती) : तालुक्यात शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणारे विद्यार्थी मुक्त मनाने जातात; परंतु शाळेची शिकस्त झालेली इमारत पाहून शिक्षक, पालकांसह त्यांच्याही निरागस मनाची घालमेल होते. प्रशासनाला मात्र त्याचे सोयरे सुटक नसल्याचे चित्र सध्या मोर्शी तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारातूनच विद्यार्थी जणू काही यमाच्या दारातून सरस्वतीचे दर्शन घेत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहेत.
कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनामार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांना सर्व सोईसुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जातात; परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे.
दापोरी येथील जिल्हा परिषद शाळा १८७९ मध्ये स्थापन झाली असून शाळेने १३८ वर्ष पूर्ण केली आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत आठ शिक्षक असून, २११ पटसंख्या आहे. ही इमारत जीर्ण झाली असून, जागोजागी तिचे प्लास्टर निघाले आहे. इमारतीच्या भिंतीला तडे गेले आहेत. अशा इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील बऱ्याचशा शाळांना जवळपास १०० वर्षे झाली असून त्या दयनीय अवस्थेत उभ्या आहेत. वर्ग खोल्याची दुरुस्ती केली नसून शिकस्त असलेल्या वर्गखोल्या अद्यापही पाडण्यात आलेल्या नाही. या इमारती विद्यार्थी-शिक्षकांसाठी धोकादायक ठरू लागल्या आहेत. काही शाळांच्या इमारती कधीही कोसळतील अशा अवस्थेत आहेत.
तालुक्यातील २५ शाळांच्या मुख्याध्यापकांनी याबाबतचा अहवाल गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. यात त्यांनी पंचायत समितीअंतर्गत विविध शाळांमधून आलेल्या प्रस्तावानुसार शिकस्त वर्गखोल्या पाडणे, मेजर दुरुस्ती करणे, नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम करणे, यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे १८ जून रोजी दापोरी, निंभी, लाखारा, उमरखेड, गोराळा, अंबाडा, डोंगर यावली, राजूरवाडी, भाईपूर, रिद्धपूर, बुऱ्हाणपूर, हिवरखेड, भांबोरा, पोरगव्हान, कवठाळ, पिंपळखुटा मोठा, सिम्भोरा, तळेगाव, दुर्गवाडा, तळणी, आडगाव, बोन्डना, मायवाडी या शाळांची मेजर दुरुस्ती करणे व शिकस्त वर्ग खोल्या पाडून नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याची मागणी करणारा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविला; मात्र या अहवालाला वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. या प्रकाराबाबत संबंधीत मुख्याध्यापकांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यांची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
या गंभीर बाबीमुळे विद्यार्थी, शिक्षक पालक दडपणाखाली आहेत. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे प्रशासन मोठा अपघात होऊन विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची वाट पाहतेय का, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. शाळेची दुरुस्ती करण्याचा, नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याचे प्रस्ताव धूळखात पडले असल्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
शाळेने प्रस्ताव पाठवला; पण निधी कधी उपलब्ध होणार?दापोरी जिल्हा परिषद शाळेच्या पाच वर्गखोल्यांची दुरवस्था झाली आहे. त्या पाडून पाच नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी जिल्हा परिषदकडे अनेक वेळा पत्र पाठवून ते पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले आहे. नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्यासाठी जागेची कुठलीही अडचण नसून शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना तडे गेलेल्या वर्गखोल्यांमध्ये जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे.